
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना बस सेवेच्या येणाऱ्या अडचणी विशेषतः विद्यार्थ्यांची प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी २९ एप्रिल रोजी राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रतापजी सरनाईक यांची भेट घेऊन कोपरगाव बस आगाराला तातडीने नवीन बस देण्याची मागणी करून त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव बस आगाराला नवीन ५ जिजाऊ बसेस मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळणच्या दृष्टीने कोपरगाव बस स्थानक अत्यंत महत्वाचे आहे. शिर्डी- मनमाड- वैजापूर- श्रीरामपूर- संगमनेर- नाशिक या शहरांना जोडणारे कोपरगाव बस स्थानक मध्यवर्ती ठिकाण असून तीर्थक्षेत्र शिर्डी जवळ असल्याने भाविकांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना जा ये करण्यासाठी बस सुविधा अत्यंत महत्वाची आहे. कोपरगाव बस आगारात बस संख्या कमी असल्याने काही बस फेऱ्या अनियमित झाल्या होत्या त्यामुळे शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि प्रवाशांना बस प्रवासात अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला या नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्यामुळे काहीशी विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्यास मोठी मदत होणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांची वेळेवर शाळेत पोहोचण्याची चिंता मिटणार असून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवासही आता अधिक सुखकर आणि आनंददायी होणार असल्याने आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्रीम.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री ना.प्रतापजी सरनाईक, पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.


