
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.२१) रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या समवेत बैठक घेऊन या बैठकीत त्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवजड वाहतुकीकडे परिवहन विभाग का दुर्लक्ष करीत आहे? असा खडा सवाल केला असता परिवहन अधिकारी निरुत्तर झाले होते.ग्रामीण भागातील अंतर्गत दळणवळण सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते तयार करण्यात आले आहेत. रस्त्यांसाठी वारंवार निधी मिळत नाही. या रस्त्यांची एक ठराविक वजन क्षमता असते आणि त्यापेक्षा जास्त वजन या रस्त्यावरून वाहून नेण्यास कायदेशीर बंदी असतांना ग्रामीण मार्गांवरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहनांची वाहतूक सुरू आहे.यामुळे रस्ते खचून खराब होत आहेत. या ओव्हरलोड वाहतुकीचा रस्त्यांच्या लगत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आणि पादचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी हि परिवहन विभाग कोणतीही कारवाई करतांना दिसत नसल्याने आ. आशुतोष काळे यांनी तीव्र करून नाराजी व्यक्त करत याबाबत कडक कारवाई न झाल्यास मला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असा सूचक ईशारा या बैठकीत परिवहन विभागाला दिला होता.
आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या या ईशाऱ्याची परिवहन विभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येऊन बैठक आटोपून अवघ्या काही तासांच्या आतच परिवहन विभागाकडून ग्रामीण रस्त्यांवरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील अनधिकृत ओव्हरलोड वाहतुकीला मोठा चाप बसणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांनी ओव्हरलोड वाहतूकी बाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचे स्वागत केले आहे.


