
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघातील विविध भागांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे अशी माहिती मिळते आहे. अशा स्थितीत अनेकदा यापूर्वी ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रशासनाशी तातडीने चर्चा करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत व जिथे नागरिकांना मदत लागेल त्यासाठी प्रशासनाने दक्ष असावे अशी चर्चा केली आहे.
वादळ आणि पावसाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी आपत्ती निवारण व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्परतेने कार्यरत ठेवावी, अशा सूचना आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.विशेषतः वीज विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून तातडीने आवश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस त्वरित प्रतिसाद देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, यावर त्यांनी भर दिला.
सध्या वादळ व पावसाचा कालावधी सुरू असल्याने प्रशासनाने सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
कोपरगाव मतदारसंघातील परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दिले आहेत.


