
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहर गेल्या काही महिन्यापासून तुंबलेल्या गटारी, त्यामुळे वाढलेली दुर्गंधी आणि डासांच्या विळख्यात सापडले असून डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदन दिले मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असतांना नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक नुसतेच नाले सफाईचा गाजावाजा करीत असले तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रभागांतील नाले तुंबलेल्या स्थितीत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात विजय त्रिभुवन यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगा शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेले मुलभूत कामेही सत्ताधारी करताना दिसत नाही. शहरात अनेक नाले तुबलेले असून सांडपाणी नाल्यांच्या वरून वाहत आहे त्यामुळे हे घाण पाणी साचू लागल्याने डासांचे साम्राज्य तयार झाले आहे. नाल्यांवर ढापे टाकले जात नसल्याने शहरातील अनेक भागांत दुर्गंधी पसरलेली आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस प्रचंड उष्णता असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तरीही नगरपरिषदेकडून दखल घेतली जात नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवक अजूनही हारतुरे घेण्यात आणि आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेले शब्द पूर्ण करायचे सोडून काम कमी आणि गाजावाजा जास्त करीत आहे. जेवढा गाजावाजा करीत आहे तेवढेच लक्ष देऊन शहरातील सगळ्याच प्रभागातील नाले साफ करणे गरजेचे आहे. शहरातील रोगराई कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित कसे राहील यासाठी सत्ताधाऱ्यांनी कामाचा गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामे करावीत असे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी शेवटी म्हटले आहे.


