
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरसह इतर भागातील शासकीय जागेवर असलेली अतिक्रमणे नियमाकुल करून शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे यासाठी मागील सहा वर्षापासून आमदार आशुतोष काळे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या प्रयत्नातून लवकरच कोपरगाव शहारातील लक्ष्मीनगरसह शहराच्या इतर भागातल अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.माधवी वाकचौरे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर मागील अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्य करीत असून हे नागरिक राहत असलेली जागा नियमानुकूल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित होता. परंतु २०१९ पासून आमदार आशुतोष काळे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्या सूचनेनुसार लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर असलेली अतिक्रमणे नियमाकुल करून त्याबाबतचे आवश्यक असणारे कागदपत्रे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्या शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरिकांना उतारे मिळावे यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने शीघ्र गतीने प्रयत्न करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी २९ नोव्हेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२० मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावे. शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांना त्त्यांच्या जागेचे उतारे लवकरात कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या होत्या. या बैठकीमध्ये कोपरगाव शहराच्या इतर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतही महत्वाची चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर या जागा नियमानुकूल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांची भेट घेवून जागा नियमानुकूल करण्याबाबत सकारात्मक चर्चा करून सहकार्य करण्याची विनंती करून त्यांना निवेदन दिले होते. या नागरिकांच्या जागा शासन नियमानुसार नियमित करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी सातत्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून वेळोवेळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देखील या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. लक्ष्मीनगर प्रमाणेच कोपरगाव शहरातील टाकळी नाका, साईनाथ नगर, सुभाष नगर भाग -१, सुभाषनगर भाग-२, संजयनगर भाग-१, संजयनगर भाग -२, लक्ष्मीनगर , टिळक नगर, गोरोबा नगर, गजानन नगर, महादेव नगर भाग-१, महादेव नगर भाग-२, लिंभारा मैदान, जिजामाता उद्यान, खडकी, गांधी नगर भाग-१, गांधी नगर भाग -२,दत्तनगर, बेट भागातील २० कुटुंब व हनुमान नगर आदी भागात मागील अनेक वर्षापासून हे कुटुंब शासकीय जागेवर राहत आहे. त्या नागरिकांची शासकीय जागेवरील अतिक्रमणे लवकरात लवकर नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे अथकपणे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ.माधवी वाकचौरे यांनी म्हटले आहे.


