
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघात शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान विविध ठिकाणी संपन्न होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महसूल विभागाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी दिनांक ११ मे रोजी सकाळी ९ वाजता हनुमानमंदिर शेजारी सभागृह,दहेगांव बोलका, पोहेगाव १० वाजता वक्रतुंड मंगल कार्यालय,त्याच प्रमाणे १५ मे रोजी कोपरगाव शहरात कलश मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे त्यात आपले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. दहेगाव बोलका महसूल मंडल विभागातील सर्व गावे,पोहेगाव महसूल मंडल विभागातील सर्व गावे आणि कोपरगाव शहर आणि कोपरगाव महसूल मंडलातील त्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचे प्रश्न मांडावे असे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी आवाहन केले आहे.
या अभियानात सातबारा उतारा, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, वारस नोंद, जमीन मोजणी, ई-पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न तसेच इतर महसुली कामांबाबत मार्गदर्शन व तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.महाराजस्व अभियानामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणार नाहीत तसेच प्रशासन व जनतेमधील समन्वय अधिक मजबूत होणार आहे. गावपातळीवरच महसुली सेवा उपलब्ध होत असल्याने सामान्य नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांपैकी एक असलेल्या या अभियानात महसूल विभागाचे व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


