Friday, May 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयत्या पिठावर रेघा कोण ओढतं?हे कोपरगावकर जाणून आहेत!!-नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद

आयत्या पिठावर रेघा कोण ओढतं?हे कोपरगावकर जाणून आहेत!!-नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहराची तहान भागविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती केल्यामुळे कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जलकुंभ अर्थात पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि ह्या टाक्या कोणामुळे उभे राहिल्या हे तुमच्यासह कोपरगावकरांना माहित आहे. त्यामुळे ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या जल कुंभाचे तुम्ही उद्घाटन करून आयत्या पिठावर रेघा ओढण्याची भाषा करत असला तरी आयत्या पिठावर रेघा कोण ओढतं? हे कोपरगावकर जाणून आहेत असा चिमटा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांना काढला आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना मंजूर करून आणली. या पाणी योजनेच्या माध्यमातून ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीबरोबरच ९५ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर, मोहनीराज नगर व साईबाबा कॉर्नर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. जसजसे या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होत आहे तसतसे कोपरगावकरांना पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या चाचण्या तातडीने घेण्याचे सांगत असतात आणि हे जनतेप्रती त्यांचे कर्तव्य देखील आहे.परंतु चाळीस वर्ष सत्ता असतांनाही कोपरगावकरांची तहान भागूच नये अशी मानसिकता असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकांनी जनतेप्रती मांडलेली भूमिका कुठेतरी खटकत असल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या पाणी योजनेच्या जलकुंभाचे उद्घाटन करतांना त्यांच्या तोंडी आयत्या पिठावर रेघा ओढण्याची भाषा न शोभणारी आहे. त्यामुळे आपण कोणत्या कामाचे उद्घाटन करतो? ते काम कुणामुळे मंजूर झाले? आणि त्या कामात आपला सबंध काय? आणि आपण बोलतो काय याचा विचार नगराध्यक्षांनी करणे गरजेचे आहे कारण ते जबाबदार व्यक्ती आहेत.परंतु त्यांना कुठेतरी आपल्या जबाबदारीचा विसर पडत असल्यामुळे दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे उद्घाटन करायचे आणि सगळे काही आम्हीच केले असे भासवायचे. यालाच म्हणतात लगीन लोकाचं आणि नाचतयं——-असे मी मुळीच म्हणणार नाही मात्र हे नक्की म्हणेन लोकाची कढी आणि धावू धावू वाढी असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांना लगावला आहे.
कोपरगावकरांना चाळीस वर्ष तहानलेलं कुणामुळे राहावं लागल हे कोपरगावकरांना चांगले माहिती आहे.त्यामुळे ज्यांच्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी हि पाणी योजना आणली त्यांना या योजनेचा फायदा करून देवून लवकरात लवकर सर्वच पाण्याच्या टाक्यांची चाचणी करा. चाचणी घेतांना थोडे फार पाणी वाया गेले तर जावू द्या पण कोपरगावकरांना पुन्हा तहानलेलं ठेवण्यासाठी पाईपलाईनने तळ्यातून पाणी दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्या. कारण सत्तेचा दुरुपयोग तुम्ही कशाप्रकारे करता याबाबतीत कोपरगावकरांना आलेले अनुभव अतिशय वाईट आहे असे नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी शेवटी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!