
जेऊर कुंभारी वार्ताहर
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष, तसेच अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचे प्रणेते मा. बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गिरमे वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
बिपिन दादा कोल्हे हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नसून, ते एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही परिचित आहेत. शिक्षण, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण विकास हे त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी कोपरगाव तालुक्यात ‘संजीवनी’ नावाने आरोग्य सेवा, शिक्षण संस्था आणि कृषी संशोधन प्रकल्प यशस्वीपणे उभे केले आहेत.
दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त बिपिन दादा कोल्हे हे कोपरगाव तालुक्यातील विविध भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटतात. ही परंपरा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली असून, त्याचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे हा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार वह्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब वक्ते यांनी, “बिपिन दादांचा हा वह्या वाटपाचा उपक्रम म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हिताचा व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मदत करणारा आहे असे सांगितले.”
बिपिन दादा कोल्हे यांचे सामाजिक कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील अनेक शाळांना मदत मिळाली असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे.
यावेळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची संचालक बाळासाहेब वक्ते,संचालक सतीश आव्हाड,माजी संचालक मधुकर वक्ते, न्यू इंडिया इन्शुरन्स
कंपनीचे मॅनेजर भिमराज वक्ते, शिवाजीराव वक्ते,अशोक राऊत,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, गिरीधर गुरसळ, भास्कर चव्हाण, कोंडीराम वक्ते, अनिता पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनुज ढुमणे यांनी केले, तर मुख्याध्यापिका प्रियंका जोशी यांनी या उपक्रमाबद्दल उपस्थित व बिपिनदादांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
.


