
जेऊर कुंभारी वार्ताहर
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्रात विठू नामाचा गजर होत असताना जि.प. प्राथमिक शाळा गिरमेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील विठू नामाचा जयघोष करत भक्तीपूर्ण वातावरणात गावातून बालदिंडी काढण्यात आली. मुलींनी साड्या परिधान करून डोक्यावर कळस व तुळस घेऊन बाल दिंडीत सहभाग घेतला. मुलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून टाळाच्या गजरात जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष केला. यश गुरसळ याने विठ्ठलाचा व भाग्यश्री पगारे हिने रुक्मिणीचा सुंदर असा वेश धारण केला होता. गिरमेवस्ती येथून निघालेली दिंडी संजय नगर मधील गणपती मंदिरामध्ये पोहोचली. गावकऱ्यांनी बाल दिंडीचे मनोभावे पूजन केले व कौतुक केले. यानंतर बालगोपाळांचा मनोवेधक रिंगण सोहळा पार पडला. यावेळी मुलींनी फुगडी घालून विठुरायाला नमन केले.हातात भगवे झेंडे, तुळशी वृंदावन, कलश घेऊन मिरवणारे छोटे वारकरी पाहून गावकऱ्यांना आनंद झाला.
शिक्षक अनुज ढुमणे यांच्या संकल्पनेतून बनवलेली आकर्षक पालखी व फलकावर रेखाटलेले विठुरायाचे तेजपूर्ण चित्र दिंडी सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
शिक्षक सुदाम साळुंके यांनी आषाढी एकादशी व वारकरी यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका प्रियंका जोशी बाल दिंडी विषयी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, भास्कर चव्हाण, नामदेव पाटिलबा वक्ते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गुरसळ व सदस्य, अंगणवाडी सेविका सिंधुताई वक्ते, सुमन जगताप, शालेय पोषण कर्मचारी सुलोचना वक्ते, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सुनील गायकवाड, प्रभाकर आंबीलवादे, पवार महाराज यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून बाल दिंडीची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


