

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड, स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी सात वाजता सर्व समाजबांधवांच्या सहभागातून आर पी आय शाखा व भिमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने संजयनगर मधून मेणबत्ती पेटवून अभिवादन फेरी काढण्यात आली.या अभिवादन फेरीमध्ये शेकडो महिला, पुरुष, युवकांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती भीमसाम्राज्य सेनेचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी दिली.अभिवादन फेरीची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आल्यानंतर अभिवादन सभेने कऱण्यात आली.अभिवादन सभेमध्ये बोलतांना आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड म्हणाले की , डॉ.बाबासाहेबांनी आपल्या देशाला राष्ट्राची एकता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे संविधान दिले. गुलामीच्या आणि अज्ञानाच्या अंधकरात गुंतलेल्या समाजामध्ये त्यांनी समतेचा आणि ज्ञानाचा दिवा लावून कोटी कोटी कुळांचा उद्धार केला.त्यांनी संपूर्ण मानव जातीला स्वातंत्र्य,समता,न्याय आदि मूल्यांचे महत्त्व लक्षात आणून दिले.त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.यावेळी भास्करराव वाकोडे, प्रदिप गायकवाड, दावीद धिवर, मंगलताई आव्हाड, आदी मान्यवरांनी आपले विचार मांडून महामानवास अभिवादन केले. सदर अभिवादन फेरीसाठी भिमसाम्राज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे सुमित पगारे यांनी सांगितले. तर अभिवादन फेरीमध्ये सर्व समाजबांधवांनी सहभाग नोंदवला याबद्दल प्रविण गायकवाड यांनी भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने सर्वांचे आभार मानले.यावेळी शेकडो महीला, पुरुष व युवक तसेच आर पी आय व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.


