
वनविभाग अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री १२.३० वा शंकर भिकाजी वक्ते यांनी आपल्या अंगणात बिबट्या बघीतला. ही बातमी वा-यासारखी संपूर्ण गावभर झाली. रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर कुणी बाहेर निघायला तयार नाही. मागील आठवड्यात महेंद्र वक्ते, नानासाहेब गुरसळ यांनी उसाला पाणी भरत असताना बिबट्या बघीतला. काशीनाथ वक्ते यांनी आपल्या पोल्ट्री फार्म जवळ बघीतला. मागील आठवड्यात कातकडे वस्ती येथे बिबट्याने शेळी फस्त केली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण, माजी उपसरपंच यशवंतराव आव्हाड, महेंद्र वक्ते, कल्याण गुरसळ यांनी वेळोवेळी वन विभागाला या संदर्भात कल्पना देऊनही वन विभाग अधिकाऱ्यांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. हे जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांना आपली शेती पडीत ठेवल्याशिवाय पर्याय नाही. शेतमजूर देखील शेतात काम करण्यास तयार नाही. रात्रीच्या वेळी घराबाहेर कुणी पडत नाही. ‘ बिबट्या आला रे आला ‘ हीच आरोळी वारंवार कानावर पडत आहे. बिबट्याच्या भीतीने गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जेऊर कुंभारी परीसरात पिंजरा लावून बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


