
कोपरगावत प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पूर्व भागातील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर येत असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना सोसायटी व सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज पुरवठा केला जात नव्हता. त्या शेतकऱ्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडून येत असलेल्या आर्थिक अडचणी सांगितल्या होत्या. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर येत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील येसगाव, ब्राम्हणगाव, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तळेगाव मळे, कासली, पढेगाव, धोत्रे, खोपडी, लौकी आदी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यामध्ये गेल्या आहेत.त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे सोसायटी व सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा होत नव्हता. नेहमीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना जर शेतीसाठी वेळेवर भांडवल उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. वेळेवर शेतीची मशागत व वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्नात देखील घट होते. सात बारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्याबाबत ना.आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांच्या समवेत बैठक घेतली होती. सहकार व महसूल खाते,जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. नांदूर मध्यमेश्वर कालवा अभियंता यांच्याशी चर्चा करून जिल्हा बँकेकडे देखील त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून अखेर हि आर्थिक कोंडी दूर करण्यात ना. आशुतोष काळे यांना यश आले आहे. त्याबाबत नुकतेच जिल्हा बँकेने लेखी पत्र देवून ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आला आहे त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी सहकारी सोसायट्यांना कर्ज देण्याच्या सूचना केल्या आहेत. ते लेखी पत्र गोधेगव आणि घोयेगाव सोसायटीच्या सचिवांना दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्याप्रमाणेच इतर गावातील ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर पुनवर्सन कायदा लागू अशा आशयाचा फेर लावण्यात आला आहे त्या शेतकऱ्यांना देखील कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेवून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल येसगाव, ब्राम्हणगाव,गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तळेगाव मळे, कासली, पढेगाव, धोत्रे, खोपडी, लौकी आदी गावातील शेतकऱ्यांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.


