कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेलेल्या आशुतोष काळे यांचे आतापर्यंत कुठलेही कर्तृत्व नसुन दुस-यांनी दिलेल्या प्रस्तावावर काम करून फुशारकी मिळवायची एव्हढा एकच कार्यक्रम ते राबवित असुन तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिंगणापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा पाठपुरावा करून तत्कालीन व सरपंच सुनिता संवत्सरकर यांच्यामार्फत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ऑगस्ट २०१८ मध्ये जिल्हा नियोजन मध्ये तसा सर्वप्रथम प्रस्ताव दिला मात्र आमदार आशुतोष काळे यांनी शिंगणापुरचे प्राथमिक आरोग्य केंद्र माहेगाव देशमुखला पळविले हे बरोबर नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भिमा संवत्सरकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आमदार आशुतोष काळे यांनी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्यापेक्षा जास्त विकासाची कामे करावीत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु त्यांनी दुसऱ्यांची विकासकामे आपल्या गावासाठी घेऊन जाऊ नये, कारण शिंगणापुर हे गाव लोकसख्येने मोठे आहे, पंचक्रोशीतील परिसर जास्त आहे, शिवाय आंतरराष्ट्रीय किर्तीचे साईबाबा शिर्डी साठी ये जा करणाऱ्या भाविकांसाठी कोपरगांव रेल्वेस्टेशन शिंगणापूर हद्दीत आहे; लहान मुलांचे लसीकरणही येथे मोठ्या प्रमाणात होते, गरोदर स्त्रियांचे प्रश्न व अन्य आरोग्याचे प्रश्न येथे सातत्याने भेडसावत असते, याशिवाय शेजारच्या कोल्हे साखर कारखान्यात असंख्य उसतोडणी कामगार येत असतात त्यात लहान मुले, महिलांचाही समावेश मोठा असतो, त्या गरीब कुटुंबातील असून रात्री अपरात्री आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्या व शिंगणापुर वासियांच्या सेवेसाठी येथे सूसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र तयार व्हावे म्हणुन तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडे पाठपुरावा करून पालकमंत्री राम शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता केली. जिल्हा नियोजन मधुन त्यासाठी मंजुरी व निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला, हे शिंगणापुरचे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरही झाले पण त्यात आमदारांची माशी शिंकली, त्यांनी शिंगणापूरचे नाव काढून स्वतःच्या गावाचे माहेगाव देशमुखचे नांव ऐनवेळी घुसवले आणि शिंगणापूरचे मंजुर प्राथमिक आरोग्य केंद्र माहेगांव देशमुखला पळवले, त्यांची ही कृती बरोबर नाही, त्यातुन ते साईबाबा संस्थान चे अध्यक्ष आहे, तेव्हा त्यांनी शिंगणापूरचे आरोग्य केंद्र आम्हास परत करावे व सरकार दरबारी असलेल्या वजनातून माहेगाव देशमुखसाठी नव्याने प्रस्ताव देऊन आरोग्य केंद्र मंजूर करुन घ्यावे असेही शेवटी भीमा संवत्सरकर यांनी म्हटले आहे.


