
कोपरगाव प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी वाढविण्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना त्याप्रमाणे आर्थीक ध्येय धोरणं घ्यायला भाग पाडून शेती आणि सहकार व ग्रामिण अर्थकारणाचे जाळे अधिक सक्षम करून कोरोना महामारीत अर्थव्यवस्था व जीडीपी वाढविण्यांसाठी अर्थसंकल्पात जी पावले उचलली ती दिशादर्शक असुन शेतक-यांना हमीभावासाठी २ लाख ३७ हजार कोटींची तरतूद केली ही बाब विशेष असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.ते पुढे म्हणाले की, संपुर्ण जग गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीशी लढा देत आहे. प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम झालेला आहे. लाखाचा पोशिंदा शेतकरी हा जगाला अन्न पुरविणारा असुन त्याच्या शेतीत पायाभूत सुविधा वाढवुन तंत्रज्ञानाची जोड देत डिजीटलायझेशनवर मोदी सरकारचा भर आहे. विकासाच्या धमन्या रस्ते असुन २५ हजार किलोमिटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी या अर्थसंकल्पात तरतुद करण्यांत आली, तर सुक्ष्म व लघु उद्योग वाढीवरही भर देण्यांत आला आहे. सहकार क्षेत्र शेतीला पुरक असुन त्याच्याशी लाखाचे पोशींदे जोडले गेले आहेत, ही बाब प्रकर्षांने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नेमकेपणाने हेरली आणि त्याच्याशी निगडीत असणारे निर्णय करण्यांवर भर दिला आहे. शेतमालासाठी कार्गो टर्मीनल्स उभारणीचे लक्ष आहे. जैविक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वच घटकांचा प्रामाणिक विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प मांडतांना केला आहे. पंतप्रधान आवास योजना देशात अग्रमानांकित असुन अनेकांच्या डोक्यावर घराचा आधार देण्यांसाठी या अर्थसंकल्पात ४८ हजार कोटींची तरतुद करण्यात आली त्यामुळे आवास योजनेत प्रलंबित असणा-या घटकांना त्याचा लाभ मिळणार आहे. ई सुविधा गांवखेडयापर्यंत पोहोचल्या तर ऑनलाईन सेवा जास्तीत जास्त ग्रामिण भागापर्यंत मिळतील, मुलांना ऑनलाईन शिक्षण सुविधा देण्याबाबतही महत्वपुर्ण घोषणा यात करण्यांत आल्या आहेत. कोरानापासुन आपण सगळेच जण आत्मनिर्भरता शिकलो असुन त्याची वाटचाल अमृतमहोत्सवी भारताला जगाच्या कानाकोप-यात घेवून जाणारी ठरणार असुन स्टार्टअप्सला बळ देण्यांचे धोरण घेण्यांची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संपुर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पात घेतल्याचेही बिपीनदादा कोल्हे शेवटी म्हणाले.


