
कोपरगाव प्रतिनिधी
द्वारकेत ऐश्वर्य तर गोकुळात प्रेम आहे, आणि त्यातील कृष्णलिला भक्त आणि परमेश्वरातील आनंद आहे. आज भौतिक सुखात व भ्रमणध्वनीच्या अभासी जगात आनंद दुरावत चालला आहे प्रत्येकाने भक्तीत मन गुंतवावे असे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. तीर्थक्षेत्र, दक्षिणकाशी गोदावरी नदी कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या 32 व्या पुण्यतिथी निमीत्त ज्ञानेश्वरी पारायण व समाजप्रबोधनकार सर्जेराव टेके (वारी) महाराज यांच्या संतवाणीतून शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याची सांगता काल्याच्या किर्तनाने ७२ व्या प्रजासत्ताकदिनी बुधवारी झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रामदासीबाबांच्या मुर्तीस महेश विजयराव गायकवाड, नारायण सारंगधर यांच्याहस्ते लघुरुद्राभिषेक महामस्तकाभिषेक घालण्यात आला त्याचे पौरोहित्य प्रदिप पदे व भाऊसाहेब जोशी गुरूजी यांनी केले. सेवानिवृत्त नायब तहसीलदार डी. आर.दुशींग यांनी मातोश्री स्व. गंगुबाई रूंजाबा दुशिंग यांच्या स्मरणार्थ रामदासीबाबा परिसर सुशोभीकरणासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोकमठाण पंचक्रोशीचा परिसर रामदासीबाबांच्या अखंड तपसाधनेच्या ऊर्जेने सिद्ध झालेला आहे. गेल्या ३२ वर्षापासून येथील भक्तमंडळ त्यानिमीत्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा परमानंद भक्तांना अखंडपणे देत असतात., दक्षिण काशी गंगा गोदावरीच्या घाटावर ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांनी तपसाधना करून या पंचक्रोशीतील असंख्य जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सोप्या भाषेत गीता संस्कारासह मुलांना योग कलेबरोबरच अध्यात्माचे शिक्षण दिले. भारत भूमीचा आध्यात्मिक पाया संत महंत, ऋषीमुनी, तपस्वी, आदी विभूतींनी घातला. उपस्थित भाविकांना बुंदी आणि मसालेभात महाप्रसाद देण्यात आला.
गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची प्रत्येक जण मागणी करत असतो.४८ वर्षानंतर कोकमठाण पंचक्रोशीवासियांनी सप्ताहाची मागणी लावून धरली आहे असे महंत रामगिरी महाराज यावेळी बोलताना म्हणाले.


