
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व बंधाऱ्यावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण खराब झाल्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याबाबत निविदा देखील प्रसिद्ध झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे संरक्षक कठडे मागील काही वर्षापासून तुटले होते. अनेकवेळा हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या बंधाऱ्यावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण देखील खराब झाल्यामुळे या बंधाऱ्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या पुणतांबा, डोणगाव, बाबतरा, वारी, कान्हेगाव, लाख, पुरणगाव आदी गावातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या बंधाऱ्यावरून जातांना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत होते. त्याबाबत वरील गावातील नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांची भेट घेवून या बंधाऱ्याची दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन ना.आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार काही महिन्यापूर्वी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड, सिंचन शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी या बंधाऱ्याची पाहणी करून पाटबंधारे विभागाकडे अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी ना.आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला यश मिळून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने २५ लाख रुपये निधी दिला असून त्याबाबत निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा अनेक वर्षापासुनचा महत्वाचा प्रश्न सोडविल्याबद्दल पुणतांबा, डोणगाव, बाबतरा, वारी, कान्हेगाव, लाख, पुरणगाव आदी गावातील नागरिकांनी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.


