
कोपरगाव प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागील तीन पिढ्यांपासून आस लावून बसलेल्या जिरायती भागाला २०२३ पर्यंत निळवंडे कालव्यातून पाणी देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सर्वच आमदार पाठपुरावा करीत असून २०२३ पर्यंत कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सावळीविहीर ते रांजणगाव देशमुख (प्रजिमा ८४) या रस्त्याच्या ३ कोटी ४० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच देशमुख मळा व खालकर मळा येथील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी तेव बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील पाच ते सहा दशकापासून कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याकडे डोळे लावून बसले होते. मात्र निळवंडे कालव्यांची कामे रेंगाळत पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार येताच निळवंडे कालव्यांसाठी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेवून निळवंडे कालव्यांसाठी ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला आहे. २०२२ पर्यंतच निळवंडेचे मुख्य कालवे पूर्ण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता मात्र दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना महामारीने शासनाच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे एक वर्ष वाया गेले. परंतु २०२३ पर्यंत मुख्य कालव्यांची कामे पूर्ण करायची असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असून जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आश्वासित केले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सर्वच आमदार त्याबाबत पाठपुरावा करीत आहे. रस्ते विकासाचा अनुशेष मोठा असतांना कोरोनाच्या संकटात देखील महाविकास आघाडी सरकार कडून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. यापेक्षा जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, काकासाहेब जावळे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, कारभारी खालकर, बाबुराव थोरात, संदीप रणधीर, किसन पाडेकर, योगेश खालकर, संतोष वर्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समितीचे पंडित वाघिरे आदी मान्यवर उपस्थित होते.


