Saturday, August 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिद्द,शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मंत्र!! - आमदार आशुतोष काळे

जिद्द,शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मंत्र!! – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

आजचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी यश मिळवायचे असेल तर जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची साथ कधीही सोडू नये. ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही स्पर्धा कठीण नसते. निरोगी शरीर, सकस आहार आणि नियमित अभ्यास या त्रिसूत्रीच्या बळावरच यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील अकॅडमी अंतर्गत कर्मवीर शंकरराव काळे स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शनिवार (दि.१) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,रयत शिक्षण संस्था काळाच्या पाऊलखुणा ओळखून शिक्षणात नवनवीन प्रयोग करत असते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात संस्थेच्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच इंटरॲक्टिव्ह बोर्ड यांसारखे अत्याधुनिक उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब, चेअरमन चंद्रकांत दळवी, उपाध्यक्ष आणि मॅनेजमेंट कौन्सिलचे सर्व सदस्य नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीचे निर्णय घेतात. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत तसेच विविध भरती प्रक्रियेत त्यांनी यश मिळवून बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या परिपक्व होवून या देशाचा यशस्वी नागरीक व्हावे यासाठी संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटील अकॅडमी सुरु करून महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पोलीस किंवा सैन्यदलात करिअर करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची कास धरली पाहिजे. ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी प्रामाणिक मेहनत घेतली, तर कोणतीही स्पर्धा कठीण राहत नाही. मोबाईल हे आजच्या काळातील गरजेचे साधन असले तरी त्याचा वापर किती आणि कसा करायचा याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. नाहीतर मोबाईलचे व्यसन लागू शकते. माणूस व्यसनामध्ये पूर्णपणे वाहून जातो त्यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आपले आरोग्य व भविष्य चांगले घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहून जिद्दीने अभ्यास करून देशाची व राज्याची सेवा करावी. आपल्या कर्तृत्वातून आपल्या गावाचे, कुटुंबाचे, पालकांचे आणि शाळेचे नाव मोठे करावे असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरु कोळपे, पं.स.माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, दिलीपराव वाबळे, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, हेमंत वाबळे, कमलेश भळगट, यशवंत निकम, मोतीराम निकम, प्रशिक्षक गौतमी बनकर, राजेंद्र धुमाळ, बापूसाहेब वाबळे, प्राचार्य प्रकाश चौरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!