
कोपरगाव प्रतिनिधी
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगर-मनमाड महामार्गावरील येवला-कोपरगाव मार्गावर आंचलगाव पाटीजवळ कंटेनर, ट्रक आणि पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक प्रवासी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहने तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडली. संततधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असताना आंचलगाव ते कोपरगाव परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
या घटनेची माहिती मिळताच आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, बिस्किटे व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याबरोबरच त्यांची आवश्यक ती विचारपूस करून शक्य ती सर्व मदत करण्यात आली.आ. विवेक कोल्हे यांनी कोपरगाव,येवला पोलिस प्रशासन यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी संपर्क करून चर्चा केली तसेच नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी नगर मनमाड महामार्गाचे दुहेरी मार्गाचे मधील अंतराचे चौपदरीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या कार्यवाहीचा प्रस्ताव यावर तातडीने कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी युवा सेवकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधत वाहने योग्य दिशेने मार्गस्थ करण्यासाठी परिश्रम घेतले. भर पावसातही कोणतीही तमा न बाळगता सेवाभावाने काम करणाऱ्या युवा सेवकांच्या कार्याचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले.संकटाच्या काळात समाजाच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणे, गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि मानवतेची सेवा करणे हीच संजीवनी युवा प्रतिष्ठानची ओळख असल्याचे या मदतकार्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपत्तीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक अडकलेल्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


