
कोपरगाव प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या बालदिंडीने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजर आणि भक्तीरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या बालवारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम जयघोष करत, वृक्षसंवर्धनाचा मोलाचा संदेश देऊन उपस्थितांची मन जिंकली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती दिंडीची आणि माहिती फलकाची सजावट! शिक्षिका वैशाली सोनवणे आणि अंगणवाडी मदतनीस माधुरी नन्नवरे यांनी रेखाटलेले विठ्ठल-रुक्मिणीचे लोभस व बोलके चित्र आणि फलकलेखन सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले.
ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणीच्या गजरात निघालेल्या या बालदिंडीत गावकरी, महिला आणि पालक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रस्त्या-रस्त्यावर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि महिलांनी घातलेल्या फुगड्या व गोल रिंगणामुळे दिंडीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या दिंडीत लहानगा देवांश गोर्डे विठ्ठलाच्या तर सिया चंदनशिव रुक्मिणीच्या मनमोहक रूपात अवतरले होते. या चिमुकल्या रूपातील विठ्ठल-रुक्मिणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
ग्रामप्रदक्षिणेनंतर पालखी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली. तेथे विठ्ठल-रुक्मिणीची रीतसर पूजा करून पालखीचे थाटात स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर मंदिराच्या सभागृहात मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी उपस्थितांना भक्त पुंडलिकाची कथा सांगून, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
बालदिंडीनिमित्त शाळेतर्फे तसेच दत्तात्रय वाघ यांच्या सौजन्याने सर्व बालवारकरी व पालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यास अंगणवाडी सेविका वनिता चौधरी, आरोग्य अधिकारी विशाल तनपुरे, वत्सलाबाई सुरे, मंदाबाई पगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश रणशूर, दत्तात्रय वाघ, संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक दगू पाटील चौधरी, सुनिता सोनवणे, कल्पना जोशी, मंदाबाई थोरात, पूजा गोरडे, आरती वाघ, शिवानी वाघ, अलकाबाई वाघ, कलूबाई ननवरे, पुष्पा ननवरे, संगीता ननवरे, संगीता चौधरी, सरुबाई थोरात, गौरी चंदनशिव, रंजना चंदनशिव, प्रमिला चव्हाण, संगीता आहेर, भिमजी वाकचौरे, गुरुदेव महाराज चव्हाण, दत्तात्रय जोशी,दगू थोरात,संदीप जाधव,पखवाद वादक अभिषेक आहेर,रुक्साना फकीर,अनिता गोरडे,लीलाबाई आहेर,जिजाबाई जाधव,मंगल चौधरी,मंदाबई चंदनशिव, निशा सोनवणे आणि शिवानी सोनवणे यांसह अनेक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गुरुदेव महाराज चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून या बालदिंडीचे आणि वृक्षसंवर्धनाच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि सर्व ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी शेवटी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


