
कोपरगाव प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यासाठी एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार मानले आहे.या मंजूर कामांमध्ये कोपरगाव तालुक्यातील १ हून अधिक रकमेची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये धामोरी येथे संविधान भवन उभारण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ९ लाख रुपये (३० टक्के निधी) वितरित करण्यात येणार आहे.तर कोपरगाव नगरपरिषद संत रोहिदास भवन उभारणे २५ लक्ष, जेऊर कुंभारी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभी करण्यासाठी १० लक्ष, कोळगावथडी येथील समाज मंदिर १५ लक्ष,काकडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण १५ लक्ष, करंजी येथे संत रविदास महाराज सभा मंडप १५ लक्ष असे विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.आमदार विवेक कोल्हे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची भावना अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकार सातत्याने सकारात्मक निर्णय घेत आहे. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत शासनाने सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे.या मंजुरीमुळे संबंधित गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.


