Saturday, July 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्मार्ट मीटर विरोधात कोपरगावात राष्ट्रवादीचा एल्गार वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर...

स्मार्ट मीटर विरोधात कोपरगावात राष्ट्रवादीचा एल्गार वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नका अन्यथा स्मार्ट मीटरची होळी करू!!

कोपरगाव प्रतिनिधी

महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहे. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढला असून नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या स्मार्ट मीटरच्या विरोधात कोपरगावमध्ये आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या धोरणांचा तीव्र निषेध करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात आले तर या सगळ्या स्मार्ट मीटरची महावितरण कार्यालयात होळी करण्याचा ईशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
राज्यभरात महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबविली जात असून कोपरगावात ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसविले जात आहे. ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्यास पोलीस आणि कायद्याचा धाक दाखवला जात आहे. यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्मार्ट मीटरचे व जुन्या मीटरच्या वीज बिलात मोठी तफावत आहे.त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेवर आणि शेतकऱ्यांवर स्मार्ट मीटरमुळे नवीन आर्थिक बोजा लादणे अन्यायकारक असून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटरमुळे गरिबांना वीज वापरणे देखील कठीण झाले असून बीज बिल भरायला थोडा जरी विलंब झाल्यास आपोआप वीज प्रवाह खंडित होतो. सर्व सामान्य आणि मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांकडे वेळेवर पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे वीज बिल भरण्यात मागेपुढे होते व स्मार्ट मीटर असल्यामुळे तात्काळ घराची वीज खंडित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोपरगाव तालुक्यात दर दिवशी तासंतास आणि दुरुस्तीच्या नावाखाली दर शनिवारी सात-आठ तास वीज खंडित होत आहे.पाऊस असेल तर वीज खंडित होणे वीज ग्राहक समजू शकतात. मात्र पाऊस नसतांना देखील वीज पुरवठा का खंडीत होतो? अशा अनेक प्रश्नाची सरबत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर केली.
महावितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या उपस्थित आणि परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नये.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून तात्काळ वरिष्ठ पातळीवर आणि मुख्य प्रशासन यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!