Saturday, July 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसावळी विहीर–शिव रस्ता ते चव्हाण वस्ती मुरमीकरण रखडले; पहिल्याच पावसात नागरिकांची गैरसोय...

सावळी विहीर–शिव रस्ता ते चव्हाण वस्ती मुरमीकरण रखडले; पहिल्याच पावसात नागरिकांची गैरसोय काम तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा!!- सामाजिककार्यकर्ते जालिंदर चव्हाण

कोपरगाव, प्रतिनिधी

जेऊर कुंभारी परिसरातील सावळी विहीर–शिव रस्ता ते चव्हाण वस्ती या महत्त्वाच्या जोडरस्त्याच्या मुरमीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले असून, पहिल्याच पावसात हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर टाकलेली खडी व मुरूम तसेच अर्धवट सोडलेले काम यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते जालिंदर चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
सावळी विहीर–शिव रस्ता ते चव्हाण वस्ती हा दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच ग्रामस्थांची या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मात्र मुरमीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत सोडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, सैल खडीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
आज सकाळी पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याची माहिती मिळताच जालिंदर चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता, “आज काम सुरू होईल”, “उद्या सुरू होईल” अशी वारंवार आश्वासने दिली जात असल्याचा आरोप केला. प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याच मार्गावरील डांबरीकरणाचे कामही संथ गतीने सुरू आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी जाड खडी टाकून रस्ता दाबण्यात आला; मात्र त्यानंतर डांबरीकरणाचे काम पुढे सरकलेले नाही. परिणामी या मार्गावरील प्रवास अधिकच धोकादायक ठरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर असूनही त्याची गती अत्यंत मंद आहे. तसेच खासदार निधीतून मंजूर झालेल्या मुरमीकरणाच्या कामालाही अद्याप वेग मिळालेला नाही. त्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया जालिंदर चव्हाण यांनी व्यक्त केली.
रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुकर रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर चव्हाण यांनी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांना दिला
.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!