Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोकाट जनावरे अन् सुस्त पालिका प्रशासनाविरोधात कोपरगावकरांचे बुधवार (दि. १९) रोजी जनआक्रोश...

मोकाट जनावरे अन् सुस्त पालिका प्रशासनाविरोधात कोपरगावकरांचे बुधवार (दि. १९) रोजी जनआक्रोश आंदोलन!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या समस्येने आता नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांच्या हल्ल्यामुळे दोन निरपराध कोपरगावकरांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सुस्त नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी बुधवार (दि. १९) रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवार (दि.१८) रोजी समस्त कोपरगावकरांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या जनआक्रोश आंदोलनात कोपरगाव शहरातील विविध सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या जनआक्रोश आंदोलन हजारोंच्या संख्येने कोपरगावकर सहभागी होणार आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार, रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज रस्त्यावरून ये-जा करताना मोकाट जनावरांची भीती वाटत असून कधी कोणते मोकाट जनावर अंगावर येईल याचा नेम राहिला नाही. रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर दोन निष्पाप कोपरगावकरांचे जीव वाचले असते, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दोन मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार? आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यानंतर नगरपरिषद प्रशासन जागे होणार? असा थेट सवाल उपस्थित करत कोपरगावकरांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
कोपरगावकरांच्या जीविताची आणि सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. कोपरगावच्या नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही तो समस्त कोपरगावकरांचा आहे त्यामुळे सर्व कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने या जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त कोपरगावकरांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!