
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच महत्त्वाच्या राज्य व जिल्हा मार्गांच्या विकासासाठी निधी द्यावा. अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी हि मागणी केली.
काळे म्हणाले की, कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, धारणगाव, मळेगाव थडी, रवंदे, चासनळी, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर, वारी-कान्हेगाव, शिंगवे आणि नपावाडी या गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र, योजना तयार करताना अनेक तांत्रिक व स्थानिक बाबींचा पुरेसा विचार झाला नाही. दीड वर्षांपूर्वी सुधारीत प्रस्ताव सादर केला. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हि कामे ठप्प आहेत.
तसेच भागवतवाडी ते झगडे फाटा, साईबाबा तपोभूमी ते शिंगणापूर रेल्वे बोगदा, देर्डे फाटा ते कोळगाव पाटी आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन ते संवत्सर चौफुली हे रस्ते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग असून या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व प्रवासी वाहतूक होते.या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली.त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.अपघात होत आहेत.शासनाच्या इतर कोणत्याही पायाभूत सुविधा विकास योजनेत समावेश करून या रस्त्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करावा.


