
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी व परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्णतेच्या तीव्रतेत काही प्रमाणात घट झाली असली, तरी खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक असणारा दमदार व सातत्यपूर्ण पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे प्रतिपादन जेऊर कुंभारीचे सरपंच यशवंतराव आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला काल झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला असून, शिवारात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, केवळ प्रारंभीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी करण्याचा निर्णय घेतल्यास भविष्यात पाऊस खंडित झाल्यास पिकांच्या उगवणीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
खरीप हंगाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, पेरणी करताना संयम आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी तसेच पिकांच्या उगवणीसाठी सातत्यपूर्ण व समाधानकारक पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे हवामान विभागाचे अंदाज, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
“एक-दोन पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली पावसाची स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी न करता आणखी काही दिवस संयम बाळगावा. दमदार व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल,” असेही सरपंच यशवंतराव आव्हाड यांनी सांगितले आहे.
.


