
जेऊर कुंभारी वार्ताहर
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथील सुरक्षा अधिकारी पदावर प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे ज्येष्ठ नेते कैलास शेजवळ यांचा कोपरगाव येथे जाहीर सत्कार करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आरपीआयचे राज्य सचिव तथा महाराष्ट्र शासनाच्या “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित दिपकराव गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलास शेजवळ यांनी श्री साईबाबा संस्थानमध्ये बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सेवेचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचाही गौरव केला. पुढील आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची नवी ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी उपमुख्याध्यापक रत्नाकर गायकवाड , उपशिक्षक पगारे सर, बौद्धाचार्य मैद सर, बौद्धाचार्य बाबासाहेब पगारे, कार्यकर्ते कुंदनराव पठारे, मुन्नाभाई शेख, साईनाथ दुशिंग यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात दिपकराव गायकवाड यांनी कैलास शेजवळ यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांनी सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेकांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजकार्याची परंपरा अशीच जोपासावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्नेह, आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभात उपस्थितांनी कैलास शेजवळ यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला सलाम केला.


