Monday, June 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिमुकल्यांच्या आगमनाने फुलली जिल्हा परिषद शाळा; जेऊर कुंभारी (गावठाण) येथे प्रवेशोत्सव सोहळा...

चिमुकल्यांच्या आगमनाने फुलली जिल्हा परिषद शाळा; जेऊर कुंभारी (गावठाण) येथे प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ज्ञानाच्या मंदिरात नवचैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जेऊर कुंभारी (गावठाण) येथे सोमवार (दि. १५ जून २०२६) रोजी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास विष्णू खटाणे हे होते. प्रारंभी मुख्याध्यापक रमेश गुरसळ यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिल्या शालेय दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण हीच उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले.
यानंतर इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभातफेरी काढण्यात आली. घोषणांनी दुमदुमलेल्या या प्रभातफेरीद्वारे गावातील नागरिकांना आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन करण्यात आले. गावकऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नव्या पुस्तकांसह आणि दप्तरासह चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
अध्यक्षीय मनोगतात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास विष्णू खटाणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. शिक्षणाच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, वकील, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी बनू शकतो. सातत्य, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे.”
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक महेंद्र रामदास वक्ते, ग्रामपंचायत सदस्य किशोर मनोहर वक्ते, प्रदीप कर्णासाहेब वक्ते, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कविता रविंद्र लिंभुरे, सौ . विद्याताई पंडोरे, नानासाहेब गुरसळ, प्रविण लकारे, विशाल लकारे, सागर पंडोरे, किरण लकारे, रोहिदास लिंभुरे तसेच शालेय पोषण आहार योजनेच्या स्वयंपाकी सौ. मंदा परसैय्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. उपाध्यापिका सौ. नलिनी भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे जेऊर कुंभारी (गावठाण) येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव हा केवळ एक कार्यक्रम न राहता शिक्षणाविषयीची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!