
अस्मि राऊत, यश शिंदे आणि आर्या चव्हाण यांचा वैयक्तिक पुरस्कारांवरही ठसा!!
कोपरगाव प्रतिनिधी
भुवनेश्वर येथील प्रतिष्ठित किट विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांनी दमदार कामगिरी करत राज्याचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकविला. २४ ते २९ मे या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावत रौप्यपदकाची कमाई केली.
राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केवळ सांघिक यशच मिळविले नाही, तर वैयक्तिक पुरस्कारांवरही आपली छाप उमटवली. मुलींच्या संघातील कु. अस्मि राऊत हिने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत “बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट” हा मानाचा पुरस्कार पटकावला. मुलांच्या गटातील यश शिंदे यानेही अचूक आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर “बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट” हा बहुमान मिळवला. तर मुलींच्या संघातील आर्या चव्हाण हिने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि कौशल्यपूर्ण कामगिरीच्या बळावर “बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट” हा किताब आपल्या नावावर केला.
अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले यशाची गुरुकिल्ली
महाराष्ट्राच्या या उल्लेखनीय यशामागे प्रशिक्षकांची मेहनत आणि योग्य नियोजन महत्त्वाचे ठरले. मुलींच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय पदक विजेते सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या अनुभवाचा आणि रणनीतीचा संघांना मोठा फायदा झाला.
या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण व दर्जेदार खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि राज्याला सुवर्ण व रौप्य पदकांचा दुहेरी मान मिळवून दिला.
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनकडून कौतुक
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड आणि महासचिव राजेंद्र इखणकर यांनी संघाच्या या अभूतपूर्व यशाचे विशेष कौतुक केले. “महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचा नावलौकिक उंचावला आहे. खेळाडूंची जिद्द, कठोर परिश्रम आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन,” अशा शब्दांत राजेंद्र इखणकर यांनी भावना व्यक्त केल्या.
अहिल्यानगरच्या खेळाडूंचीही उल्लेखनीय कामगिरी
या यशस्वी महाराष्ट्र संघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अंजली दीपक खवले, रईसा जावेद शेख आणि आदित्य संदीप काळे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या यशाबद्दल महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र इखणकर, उपाध्यक्ष इंद्रजित नितीनवार, टेक्निकल कमिटीचे अध्यक्ष अशोक सरोदे, सहसचिव मकरंद को-हाळकर, जिल्हाध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधीर चपळगावकर, सहसचिव कल्पेश भागवत, रिजवान पठाण, शैलेश गवळी, संजय साठे, शरदचंद्र धारुरकर, प्रदीप साखरे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक दुहेरी यशामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


