
जेऊर कुंभारी वार्ताहर
आधुनिक युगात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वेगाने प्रसार होत असला तरी पारंपरिक शेती संस्कृतीची नाळ जपणारे शेतकरी आजही ग्रामीण भागात पाहायला मिळतात. अशाच कृषिप्रेमी वृत्तीचे दर्शन चांदेकसारे येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब चंद्रकांत गुजर यांनी घडवून आणले आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासह पारंपरिक कृषी संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांनी कर्नाटक राज्यातील निपाणी येथून तब्बल ३ लाख २१ हजार रुपये किमतीची उच्च प्रतीची बैलजोडी खरेदी केली आहे. या खरेदीची सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
बैल हे भारतीय शेती संस्कृतीचे अविभाज्य अंग मानले जाते. अनेक शेतकरी आजही शेतीची मशागत, पेरणी तसेच इतर कामांसाठी बैलांचा उपयोग करतात. उत्तम आरोग्य, मजबूत बांधा, चपळता आणि शेतीकामासाठी उपयुक्त गुणधर्म असलेल्या बैलांची निवड करून बाबासाहेब गुजर यांनी ही बैलजोडी खरेदी केली. शेतीबाबतची त्यांची दूरदृष्टी आणि गुणवत्तेला दिलेले प्राधान्य यामुळे ही खरेदी विशेष ठरत आहे.
निपाणी येथे बैलजोडी खरेदीच्या वेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी संचालक संजय दौलतराव होन व रोहित संजय होन यांनी बाबासाहेब गुजर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. कृषी क्षेत्रातील त्यांची निष्ठा, शेतीप्रती असलेले प्रेम आणि उत्कृष्ट बैलजोडीची निवड याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संचालक संजय होन यांनी बोलताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक शेतीच्या साधनांनाही महत्त्व देणे गरजेचे आहे. बैल हे केवळ शेतीचे साधन नसून ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहेत. अशा काळात लाखो रुपयांची बैलजोडी खरेदी करून बाबासाहेब गुजर यांनी शेती आणि पशुधनाबद्दलची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
बैलजोडीच्या खरेदीमुळे बाबासाहेब गुजर यांच्या शेतीकामाला निश्चितच गती मिळणार असून, इतर शेतकऱ्यांनाही दर्जेदार पशुधनाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे चांदेकसारे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांचे अभिनंदन करत आहेत.
ग्रामीण भागातील शेती आणि पशुधन यांचे अतूट नाते अधोरेखित करणारी ही घटना केवळ एक खरेदी नसून पारंपरिक कृषी संस्कृतीला दिलेले बळ मानले जात आहे. बाबासाहेब गुजर यांच्या या उपक्रमामुळे शेती व्यवसायाबाबत सकारात्मक संदेश निर्माण झाला असून, कृषी क्षेत्रात गुणवत्ता आणि परंपरा यांचा समन्वय साधण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.


