
कोपरगाव प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्रीम.सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेन घेवून जात आहेत. संपूर्ण देशात आपले राज्य सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या बाबतीत अव्वल कसे राहील यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असून विकसित राज्य करण्यासाठी संपूर्ण राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या माध्यमातून शाश्वत पाणी व्यवस्थापन संकल्पना अधिक बळकट होवून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा नव्या जल क्रांतीची दिशा ठरणार असल्याचा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत २५ ते २९ एप्रिल ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार (२६) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव मतदार संघातील कुंभारी येथे दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या पाण्याचे विधिवत जल पूजन करून या पाण्याचा जल कुंभ पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदिप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या देशातील दूरदर्शी व लोकाभिमुख शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला. घाट धर्मशाळा, तीर्थक्षेत्र विकास, पाणी व्यवस्थापन, लघु सिंचन आणि समाज हिताच्या अनेक प्रभावी कामातून त्यांनी आदर्श सुशासन कसे असावे याचा आदर्श घालून दिला आहे. जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू नये यासाठी लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण आणि जलसंवर्धन, शेतीपूरक विकास हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणादायी असून ह्या प्रेरणेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन संकल्पना अत्यंत चांगली आहे. या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत होण्यास मदत होवून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली जलसंधारणची कामे त्या सोबतीला ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेमुळे महाराष्ट्र राज्य नक्कीच दुष्काळ मुक्तीवर मात करील व राज्यातील शेतकरी, जनता सुखी होईल असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. व ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा हा विशेष राज्यव्यापी उपक्रम हाती घेतल्याबद्दल महायुती शासन व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार मानले.
यावेळी प.पू.राघवेश्वरनंदगिरीजी महाराज, गोदावरी पाटबंधारे कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता संदिप पाटील, स्व. नामदेवरावजी परजणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, प्रशांत घुले, विष्णु शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक नानासाहेब चौधरी, माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, डॉ. आय. के.सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


