कोपरगाव प्रतिनिधी
जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा सोमवार (दि.२७) रोजी कोपरगाव येथे येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जल यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्रीम.सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेतून २५ ते २९ एप्रिल या कालावधीत ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौडी या दोन पवित्र स्थळांपासून एकाच वेळी या यात्रेला प्रारंभ झाला असून ही ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा कोपरगाव येथे येणार आहे.
या जल यात्रेचे आगमन सोमवार (दि.२७) रोजी सकाळी नऊ वाजता श्री साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे होणार असून ही यात्रा पुढे वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर,खुलताबाद, घृष्णेश्वर, कन्नड, चाळीसगाव, धुळे, शिरपूरमार्गे मध्य प्रदेश राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी असलेल्या महेश्वर येथे जाणार आहे. या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या स्वागतासाठी श्री साईबाबा कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे या यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


