
कोपरगाव प्रतिनिधी
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यास्थळावरील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल विकास केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीर्षीही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.मा.खासदार स्व.कर्मवीर शंकरराव काळे व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांचे सर्व धार्मिक कार्यात नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. कारखाना व परिसरातील स्वामींच्या सेवेकऱ्यांना महाराजांची सेवा करता यावी यासाठी कारखाना कार्यस्थळावर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना करून सुरु झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची परंपरा आजतागायत सुरु असून गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून याहीवर्षी श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येवून १५० महिला व ३५ पुरुष असे एकूण १८५ पारायणार्थी स्वामी चारित्र पारायण सप्ताहात पारायणाला बसले होते. केंद्रात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्याला त्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या पुढाकारामुळेच हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वामी चारित्र पारायण सप्ताहात अध्यात्म आणि सेवेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. या सात दिवसांच्या कालावधीत अहोरात्र प्रहार सेवा देण्यात आली. यामध्ये दोन व्यक्ती माळ जप, दोन व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि दोन व्यक्तींचे अखंड वीणा वादन अशा स्वरूपात रात्रंदिवस नामस्मरण सुरू होते. या धार्मिक व शिस्तबद्ध सेवेमुळे एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती निर्माण होवून सात दिवस आयोजित करण्यात आलेल्या अखंड नामजप यज्ञ आणि स्वामी चारित्र्य पारायणाने संपूर्ण परिसर स्वामींच्या भक्तीने न्हाऊन निघाला होता. यामध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व परीसरातील सेवेकऱ्यांसह सुरेगाव, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, शहाजापूर, कोळगाव माळ, विघनवाडी आणि वेळापूर येथील अनेक महिला भगिनींसह स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींचरणी आपली सेवा अर्पण केली.
या सोहळ्याची सांगता बुधवार (दि.१५) रोजी महाआरतीने करण्यात येवून नंतर उपस्थित सर्व भाविकांना आणि सेवेकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या पारायण सप्ताहामध्ये दैनंदिन संस्कार,आचार विचारांचे आदान प्रदान करण्यासह अखंड स्वामी नामस्मरण सुरु आसल्याने परिसरात भक्तीचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.या सांगता सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


