Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव येथे ‘कुटुंब मेळावा’ उत्साहात संपन्न!!

श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव येथे ‘कुटुंब मेळावा’ उत्साहात संपन्न!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

रेनबो इंटरनॅशनल स्कूल, पावर्ड बाय श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव येथे शनिवार, दि. ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेला “कुटुंब मेळावा” हा कार्यक्रम उत्साह, आनंद आणि भावनांचा सुरेख संगम ठरत अत्यंत दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी इस्कॉनचे धर्मप्रसारक श्री लक्ष्मी नारायणदास,रेनबोचे सचिव श्री संजय नागरे, प्राचार्या विद्या विश्वनाथन, अधिष्ठाता सागर पाटील, समन्वयक पूजा चौधरी यांच्यासह बहुसंख्य पालक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्री लक्ष्मी नारायणदास यांनी आपल्या मधुर व प्रभावी प्रवचनातून कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत, आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेला संवाद पुन्हा जिवंत करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले. मृदंगाच्या ठेक्यावर “हरे राम हरे कृष्ण” व “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले आणि उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेली “नात्यातील हरवत चाललेला संवाद” ही नाटिका प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी ठरली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण रंगतदार आणि आनंदमय केले.
प्राचार्या विद्या विश्वनाथन यांनी पालकांशी सुसंवाद साधताना, आजच्या गतिमान युगात कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम आणि आत्मीयता कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी संवाद हेच नातेसंबंध टिकवण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत, कुटुंबात परस्पर संवाद वाढवण्याचे आवाहन केले.
पालकांनीही आपल्या मनोगतात या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, अशा कार्यक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘पदपूजन’ हा हृदयस्पर्शी उपक्रम. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पदपूजन करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण इतका भावनिक होता की अनेक पालकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू अनावर झाले.
श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकवर्गातून उत्स्फूर्त स्वागत व भरभरून कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा न राहता, कुटुंबातील नात्यांना नवसंजीवनी देणारा आणि संस्कारांची जाणीव करून देणारा ठरला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक गोरख पगारे यांनी केले, तर आभारप्रदर्शन समन्वयक पूजा चौधरी यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!