
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघातून वाहणारी पवित्र गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे याबाबत महायुती शासनाने पाठपुरावा सुरु होता.त्याबाबत बुधवार (दि.०१) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत महायुती शासनाने नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्या माध्यमातून गोदावरी नदीचे संवर्धन होवून पर्यावरणाचे रक्षण होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
पर्यावरणाचे रक्षण होवून गोदावरी नदी संवर्धनासाठी महायुती शासनाने केलेल्या पाठपुराव्यातून पर्यटन विभागाकडून २० कोटी निधी मंजूर करून आणला आहे. या २० कोटी निधीतून दोन किलोमीटर पर्यंतच्या गोदावरी नदी पात्राची स्वच्छता करून गाळ काढणे, प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य घाट बांधणे, जॉगिंग ट्रॅक आणि पथ रस्त्यांची निर्मिती करणे, एक किलो मीटर पर्यंत ड्रेनेज डायव्हर्शन आणि स्टोन पिचिंग करणे, रिटेनिंग वॉल आणि गॅबियन वॉल, स्वच्छता गृह बांधणे, वनीकरण आणि वृक्षारोपण करणे, कचरा कुंडी व नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविणे, नाला साफसफाई आणि प्लास्टिक कचऱ्याची तपासणी, घनकचरा तपासणी यंत्रे तसेच सोलर स्ट्रीट लाईट बसविणे अशी विविध कामे होणार आहे.पवित्र गोदावरी नदी कोपरगावकरांना मिळालेली अनमोल देणगी असून या गोदामाईच्या काठी पौराणिक,धार्मिक,ऐतिहासिक परंपरा लाभलेले कोपरगाव शहराबरोबरच मतदार संघातील अनेक गावे वसलेली आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या कोपरगाव शहराला वळसा घालणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे होते. पुढील वर्षी नासिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महायुती शासनाने नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे निश्चितपणे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.आपली गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होवून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन योजनेत गोदावरी नदीचा समावेश केल्याबद्दल असंख्य पर्यावरणप्रेमी व कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने ह्या निर्णयाचे स्वागत करून महायुती शासनाचे आमदार आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.


