Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीवनवृक्ष-लेख

जीवनवृक्ष-लेख

एकाच झाडाच्या फांदीवर जशा एकाच
रंगाच्या वेगवेगळ्या रंगछटा असणारी पाने आढळतात, त्याचप्रमाणे जीवनातही जीवन जगत असताना वेगवेगळ्या अनुभवांचे रंग आपल्या जीवन रुपी झाडाच्या फांदीला येत असतात. जीवन,आयुष्य हे एकदाच मिळतं. परंतु काळानुसार,घटनानुसार वेगवेगळे अनुभव येतात. तसे ते अनुभव जीवन समृद्ध करतात. माणसाला परिपक्व करतात. झाडाला जसे फळं येतात, ते परिपक्व स्वरूपातच जन्म घेतात असे नाही, तर त्यांनाही त्यांच्या सगळ्याच अवस्थांतून जावे लागते… जसे झाडाच्या फांद्यावर उगवणाऱ्या पहिल्या पानाचा कोंबाचा रंग हा हलकासा पोपटी असतो, थोडे मोठे झाल्यावर तोच रंग गडद पोपटी होतो, अजून थोडे मोठे झाल्यावर तो गडद हिरवा होतो आणि अजून थोडीशी वाढ झाल्यानंतर त्याचा रंग पिवळा होतो. आणि वेळ आल्यावर तेच पिवळे पान झाडापासून, फांदीवरून निखळून जमिनीवर पडते. ज्या पानाने आतापर्यंत अभिमानाने झाडाच्या फांदीवर वाढवून आपले हट्ट पुरवून घेतले होते, शेवटी त्यालाही झाडाचा अविभाज्य अंश असूनही योग्य वेळ आल्यावर निखळून दूर जावे लागले. अगदी तसेच मानवी जीवनाच्या झाडावरून त्याचे पानरूपी असलेले आपण मनुष्य यांनाही योग्य वेळ आल्यावर सरतेशेवटी मातीमोलंच व्हायचे असते हे विसरून चालणार नाही… पानांच्या वेगवेगळ्या रंगाप्रमाणे मानवी जीवनाचे हे जगण्याचे, वाढण्याचे, बोलण्याचे, खेळण्याचे, नाते जपण्याचे, वेगवेगळे रंग आहेत आणि या रंगांना योग्य न्याय मिळवून देण्याचे कार्य हे नात्यांच्या मार्फतच होत असते. मानवी जीवनात सर्वच नात्यांना मर्यादा येतात. जशा की झाडालाही मर्यादा असते जीवन काळाची, पानांनाही मर्यादा असते झाडांवर डोलण्याची, कळीलाही मर्यादा असते कळी म्हणून जगण्याची, आणि फुलालाही मर्यादा असते झाडाच्या माथ्याची शोभा वाढवण्याची. इतकेच नव्हे तर मुळांमूळे घट्ट आणि थाटात उभे असणारे झाड हे सर्व एकमेकांचा अविभाज्य घटक असूनही मुळांनाही मर्यादा असते झाडाचा बहार पेलण्याची… थोडक्यात काय तर, जीवन जगताना मनुष्यालाही मर्यादा ठरलेल्या आहेत. वेगवेगळ्या अनुभवांचे रंग घेऊन जीवन समृद्ध करायचे की जीवन नष्ट करायचे हे शेवटी व्यक्तीपरत्वे अवलंबून. म्हणूनच जीवन रुपी झाडावरून आपल्या आयुष्याचे हे पान पिवळ्या रंगात रूपांतरित होऊन निखळून पडण्याच्या आतच जीवनाचा आनंद घ्यायला शिकला पाहिजे. कोणतंही नातं असो, ते विश्वासाने व मैत्रीपूर्ण, हक्काने जपलं पाहिजे. चुकलं तर माफ करता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जीवन रुपी वृक्षाचा जीवनकाळ संपण्याच्या आतच निळ्या नभाखाली बहारदारपणे डोलता आलं पाहिजे…

स्वलेखन- लेखिका सौ. आरती गोरख सोनवणे (गलांडे)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!