
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगावसह तालुक्यातील विविध भागात अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. धामोरी परिसरातील झेड कॉर्नर ते धामोरी या मार्गावर मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
विशेष म्हणजे विवाह सोहळे उरकून अनेक नागरिक आपल्या गावी परतत होते, तर काही जण हळदी समारंभ तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी प्रवास करत होते. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ही माहिती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना समजताच त्यांनी तत्काळ कार्यकर्ते व माजी उपसभापती विजय साळुंके यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर विजय साळुंके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्वतःच्या जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरू केले. काही वेळातच रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
संकटाच्या काळात समाजासाठी धावून जाणे आणि नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहणे हीच कोल्हे परिवाराची कार्यपद्धती असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. “सेवा हाच धर्म” ही भावना जपत कार्यकर्त्यांनीही सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. अशा प्रसंगी समाजासाठी उपयोगी ठरण्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


