Wednesday, August 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट अपघातांना नगरपरिषद प्रशासन जबाबदार!!-राष्ट्रवादी काँग्रेस

कोपरगावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट अपघातांना नगरपरिषद प्रशासन जबाबदार!!-राष्ट्रवादी काँग्रेस

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, या जनावरांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मोकाट जनावरांच्या धडकेत एका निरपराध नागरिकाचा मृत्यू झाला असून, ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अन्य एका अपघातात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनांना नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू किंवा जखमी झाल्याच्या घटनांमध्ये नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन बुधवार (दि.१२) रोजी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजितजी निकट यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा व महाविद्यालय परिसर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेकदा ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी अथवा वाहनांच्या मार्गात ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मोकाट जनावरांच्या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. २० जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मोकाट जनावराने दिलेल्या धडकेत एका निष्पाप नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नाही. ११ ऑगस्ट रोजी धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटलजवळ मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला मोकाट जनावराने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात.नगरपरिषदेच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आणखी एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट न पाहता शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांमध्ये नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून, संबंधितांकडून कसूर झाली असल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!