
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्यांग कल्याण निधी वितरित करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ शहरातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या नियमानुसार पालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी ५ टक्के निधी हा केवळ दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरला जातो. या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी थेट अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग बांधवांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक ती सहायक उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जात आहे. याकरिता दिव्यांग बंधू भगिनींकडे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून दिव्यांग बंधू भगिनी कोपरगाव नगरपरिषद हद्दीत कायमस्वरूपी रहिवासी हवे आहेत. अश्या सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे १८ मे या अंतिम तारखे पर्यंत जमा करावे.
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा आ. आशुतोष काळे यांचा मानस आहे. यामुळे कोपरगाव शहरातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक भावना असल्याने शहरातील पात्र दिव्यांग बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा. दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी किंवा ९९२२३१०००४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केले आहे.


