
दिनांक ९ सप्टेंबर २०२५. माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी ता पारनेर या शाळेत माझी बदली झाली. माझ्या नव्या शाळेत मी ९ तारखेला रुजू झालो.
दुसऱ्या दिवशी माझा घसा बसला असल्याने शाळेच्या परिपाठामध्ये स्वतःची ओळख करून देताना शब्द बाहेर पडत नव्हते. कसेबसे मी माझे नाव सांगितले आणि काही महत्त्वाच्या सूचना मुलांना दिल्या. पण, माझा घसा दुखत असल्याने आवाज वेगळाच येत होता.
परिपाठानंतर आम्ही शिक्षकांनी कामाची वाटणी केली आणि माझ्या वाट्याला इयत्ता चौथीचा वर्ग आला. ३५ वर्षांच्या नोकरीतील प्रत्येक नव्या शाळेत नवी सुरुवात माझ्यासाठी एक नवा अनुभव घेऊन येत होती. वर्गात प्रवेश करताच मुलांनी फुले देऊन माझे स्वागत केले. मी प्रथम वर्गात अगरबत्ती लावली पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही “सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभू” या प्रार्थनेने केली. पहिला दिवस असल्याने मुलांना शिकवण्याऐवजी शिस्त व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. अशा पद्धतीने मुलांच्या मनात नवीन शिक्षकांबद्दल असलेली भीती घालवण्यासाठी मी शिकवण्याऐवजी त्यांच्याशी गप्पा मारून आणि मैत्री करून हा दिवस घाल वला. पण, माझा घसा अजूनही साथ देत नव्हता.
त्यांचा पहिल्या दिवसाचा अनुभव जाणून घेण्यासाठी दुपारनंतर चार वाजल्यानंतर मी मुलांना पुढे बोलावले तुम्हाला पहिला दिवस कसा वाटला तुमच्या मनात आधी कोणते विचार होते ते सांगायच आहे
सुरवातीला मुलांना थोडे अवघडल्यासारखे वाटले परंतु मी त्यांना सांगितले तुम्हाला जस बोलता येईल तस सांगा मग काही मुले स्वतःहून पुढे आली. त्यांच्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आम्हाला वाटले की नवीन सर रागीट स्वभावाचे तर नसतील ना? आमच्या मनात खूप भीती होती, पण तुम्ही पहिल्याच दिवशी खाऊ देऊन आमचे तोंड गोड केले आणि आम्हाला शिस्तीचे महत्त्वही पटवून दिले.” नंतर लाजरी आणि कमी बोलणारी मुलेही धीटपणे पुढे येऊन बोलू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मला पहिल्याच दिवशी या मुलांनी आपलेसे केले, असे वाटले.
संध्याकाळी घरी गेल्यावर कामाच्या धावपळीत मला माझ्या घशासाठी औषध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही माझ्या घशाची परिस्थिती तशीच होती. परिपाठ झाला आणि मुलांना आवश्यक माहिती देऊन आम्ही वर्गात गेलो. मुले शांतपणे आपापल्या जागी बसली होती. मुलांची हजेरी घेतली अन तेवढ्यात एक चिमुकला विद्यार्थी माझ्या जवळ आला. त्याने माझ्या हातात नारंगी रंगाच्या गोळ्यांचे पाकीट ठेवले.
मला वाटले की हे चॉकलेट आहे. “हे काय आहे बाळा?” असे विचारताच, तो म्हणाला, “या स्ट्रेप्सिल्सच्या गोळ्या आहेत सर, तुमचा घसा दुखतोय ना, म्हणून तुमच्या घशासाठी!” त्याचे ते निरागस शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. एका नवीन शिक्षकासाठी त्याच्या मनात असलेली ही आपुलकी पाहून मी निःशब्द झालो.
मी त्याला जवळ घेतले आणि विचारले, “या गोळ्या तुला कोणी दिल्या?” त्याने जो अनुभव सांगितला, तो माझ्या मनाला भिडला. तो म्हणाला, “मी माझ्या पप्पांना सांगितले, ‘आमच्या नव्या सरांचा घसा दुखतोय. मला त्यांच्यासाठी घशावरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, मला पैसे द्या.’ मी पैसे घेतले आणि मेडीकलमधून तुमच्यासाठी गोळया घेतल्या.”
त्याच्या या बोलण्याने माझे मन भरून आले. एका लहानग्याने माझ्यासाठी केलेली धडपड, त्याचे प्रेम माझ्यासाठी अनमोल होते. पळशीसारख्या एका लहानशा खेड्यातील, जिथे मुले वाडी-वस्तीवरून तीन-चार किलोमीटर पायपीट करून येतात, अशा परिस्थितीत हर्षसारख्या मुलाने दाखवलेली ही माणुसकी खरोखरच मन हेलावून टाकणारी होती.
हर्ष झावरे हा स्वभावाने शांत आणि अबोल होता, पण अतिशय समजूतदार. घरची परिस्थिती बेताची. त्याचे आई-वडील शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. अशा परिस्थितीतही त्याने माझ्यासाठी केलेली ही कृती खूप मोठी होती. माझ्या ३५ वर्षांच्या नोकरीत मला अनेक अनुभव आले, पण हर्षने दिलेल्या या अनमोल भेटीची सर कशालाच येणार नाही. एका चिमुकल्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसणारे प्रेम आणि शिक्षकांबद्दलची आत्मीयता पाहून मला माझ्या व्यवसायाचा सार्थ अभिमान वाटला.
या घटनेने मला हेच शिकवले की ज्ञान देणे-घेणे हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसते, तर त्यात मानवी भावना आणि प्रेम यांचाही समावेश असतो. हर्षने दिलेल्या या गोळ्या फक्त औषध नव्हते, तर ते त्याच्या निर्मळ मनाचे प्रतीक होते. तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यांत पाणी येते. एका लहानग्याने मला निःशब्द केले आणि जीवनातील सर्वात मोठा माणुसकीचा धडा शिकवला.
सुदाम साळुंके सर
उपाध्यापक
जि. प. प्राथमिक शाळा पळशी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर


