
कोपरगाव प्रतिनिधी
श्री माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात शालेय साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी अतिथी व विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध करून देणारे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, औद्योगीक वसाहतचे उपाध्यक्ष केशवराव भवर तसेच सौ. प्राजक्ता आहेर,सौ. शैलेजा रोहम यांनी सहकार्य केले.या उपक्रमाचे आयोजन जेष्ठ नागरिक सेवा मंच, कोपरगाव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. भावनाताई गवांदे यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन परागजी संधान, औद्योगिक वसाहतचे उपाध्यक्ष केशवराव भवर, डॉ. विलास आचारी व सौ. शैलजा रोहम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.
सामाजिक जाणीवेतील सहभागातून शालेय साहित्य व गणवेश वाटपाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला असून शैक्षणिक गुणवत्तेसह सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम ठरल्याची भावना पराग संधान यांनी व्यक्त केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाल्यामुळे त्यांच्यात नवीन उर्जा व आनंद संचारला.विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी आनंद वाटतो कारण पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहाला अधिक गतिमान होण्यासाठी प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे व ही एक प्रकारे राष्ट्रसेवा देखील असल्याचे संधान म्हणाले. केशवराव भवर यांनीही शिक्षणाचे महत्व विषद करून या उपक्रमामागील सेवा भाव व्यक्त करत विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे कार्याध्यक्ष विजय बंब, सचिव योगाचार्य उत्तमभाई शहा, सौ. शैलजा रोहम व डॉ. विलास आचारी यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सामाजिक जाणिवा दृढ करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील बोरफळकर सर, काटे सर, विखे सर यांसह सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चनाताई बोराडे यांनी प्रभावीपणे केले तर शेवटी आभार प्रदर्शन सौ. वाकचौरे ताई यांनी केले.


