
जेऊर कुंभारी वार्ताहर
समृद्धी महामार्गावरील आयसी/२० या इंटरचेंजवरील टोल पावतीवर दाखवला जाणारा “कोकमठाण” हा एक्झिट मेसेज तात्काळ बदलून “जेऊरकुंभारी” असा करावा, अशी मागणी काँग्रेसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज (२९ जुलै) रोजी त्यांनी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
या निवेदनात शिंदे यांनी नमूद केले आहे की, समृद्धी महामार्ग (मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे) हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा द्रुतगती मार्ग असून, आयसी/२० हा इंटरचेंज शिर्डी आणि कोपरगावकडे जाणाऱ्या यात्रेकरू व पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक्झिट पॉइंट आहे. या टोल प्लाझाचे भौगोलिक स्थान “जेऊरकुंभारी” या गावात असूनही, सध्या टोल पावतीवर “कोकमठाण” असे नाव प्रदर्शित होत आहे. या चुकीमुळे प्रवाशांना, पोलिस पंचनाम्यांमध्ये व इतर प्रशासनिक कामकाजात संभ्रम निर्माण होतो, असेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. स्थानिक भूगोलाशी परिचय नसलेल्या वाहनचालकांसाठी हा भ्रम अधिक त्रासदायक ठरतो, कारण टोल पावतीवर दाखवलेले नाव प्रत्यक्ष स्थानाशी सुसंगत नसते.
त्यामुळे समृद्धी महामार्गावरील आयसी/२० वरील एक्झिट पावतीवरील मेसेज “कोकमठाण” ऐवजी “जेऊरकुंभारी” असा बदलावा, ही मागणी करण्यात आली आहे. या बदलामुळे प्रवाशांना शिर्डी, कोपरगावकडे जाण्याचा मार्ग अधिक स्पष्टपणे समजेल आणि नेव्हिगेशनचा अनुभव सुसह्य होईल, असेही शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
“या बदलामुळे समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना अधिक स्पष्टता मिळेल व अनुभव अधिक सुलभ होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


