
कोपरगाव प्रतिनिधी
केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री.बागडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आदी उपस्थित होते.
राज्यपाल बागडे म्हणाले, चांगल्या भावनेने सहकार क्षेत्रात काम केल्यास संस्थांना तोटा होत नाही, तोटा झाला तरी त्याची भरपाई अधिक क्षमता वापरून करता येते. देशात सहकार क्षेत्रातील विविध उद्योग मागील ६० वर्षांपासून यशस्वीपणे चालू आहेत.
दूध उत्पादक व सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो, असे नमूद करून राज्यपाल बागडे म्हणाले, दूधसंघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे. उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील. दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे. दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे, असेही त्यांनी सांगितले.




