

शेतकऱ्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव ; आंदोलनाचा इशारा!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी परिसरात खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे पिके जगवावी कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरणचे कार्यालय गाठून महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात गेल्या आठवड्यापासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. पाच मिनिटे वीज पुरवठा येतो व तासभर खंडित होतो अशी परिस्थिती असल्याने विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. सध्या उन्हाळ कांदे लागवड सुरु आहे, मात्र खंडित वीज पुरवठयामुळे कांदा लागवड संकटात सापडली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते आर्थिक भुर्दंड सहन करून जनरेटरचा वापर करीत आहेत मात्र सामान्य शेतकऱ्यांचे हाल आहेत. तारतंत्री किंवा वीज कार्यालयात संपर्क साधला असता उडवाउडविवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दि.१४ जाने रोजी जेष्ठ नागरिक मधुकर तुळशीदास वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली थेट वीज वितरण कार्यालय गाठत महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत
वारंवार वीजपुरवठा खंडित का केला जातो? असा जाब विचारण्यात आला. महावितरणकडून विज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास नैसर्गिक संकटाप्रमाणे मानवनिर्मित संकाटाना सामोरे जावे लागत आहे, अशा तीव्र शब्दात मधुकर तुळशीदास वक्ते यांनी नाराजी व्यक्त केली व तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास स्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक मधुकर तुळशीदास वक्ते,
माजी सभापती शिवाजीराव वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, संचालक बाळासाहेब वक्ते, गौतम बँकेचे माजी व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते,विजय रोहम, राजेंद्र गिरमे, माजी उपसरपंच यशवंतराव आव्हाड,माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, रामभाऊ आव्हाड,कोंडीराम वक्ते,बाजीराव वक्ते,संजय शांतीलाल वक्ते,अमोल दौंड,अविनाश आव्हाड,प्रा.मधुकर वक्ते अभिजीत गुरसळ,किरण गुरसळ,आदी उपस्थित होते.


