Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबवा !!- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबवा !!- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

 कोपरगाव प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम राबवावी आणि जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते.
श्री.सालीमठ म्हणाले, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रांगेत उभे राहायला सावलीची व्यवस्था, प्रतीक्षा कक्ष, सायंकाळी प्रकाश व्यवस्था, रॅम्प, मतदान कक्षात प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाळणाघर, व्हीलचेअर आदी किमान सुविधा कराव्यात. मतदारांसाठी आवश्यक सुविधा देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. दोन किंवा अधिक मतदान केंद्र एकच ठिकाणी असल्यास स्वयंसेवकांची नियुक्ती करावी आणि परिसरात सूचना फलक लावण्यात यावे. मतदान केंद्रावर मतदार सुलभपणे पोहोचेल अशी व्यवस्था असावी.
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे ई प्रतिज्ञापत्राचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदान करणार असल्याचे ई – प्रतिज्ञापत्र भरायचे आहे. या उपक्रमासाठी लिंक मिळाल्यानंतर अधिकाधिक व्यक्ती मतदान करण्याचे ई – प्रतिज्ञापत्र भरतील असे प्रयत्न करावेत. प्रतिज्ञापत्र संकेतस्थळावर सादर करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ई प्रमाणपत्र देण्यात येईल.
महिला बचत गट, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने मतदार जागृती मोहीम आखण्यात यावी. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्राच्या परिसरात गृहभेटीद्वारे मतदारांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अराजकीय सामाजिक आणि सेवाभावी संस्था, व्यक्तींची मदत घेण्यात यावी. सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
श्री.येरेकर म्हणाले, ग्रामसेवकांनी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर भेट देऊन किमान आवश्यक सुविधेची माहिती घ्यावी. स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे आवाहन करावे. यासाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करा. स्थानिकस्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी सुविधा द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी स्वीप समन्वयक कडुस यांनी मतदार जागृती उपक्रमांची माहिती दिली. कमी मतदान झालेल्या शेवटच्या १० टक्के मतदान केंद्रांवर आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष द्यावे. ८ नोव्हेंबर रोजी मतदार शपथद्वारे या मोहिमेचा शुभारंभ करावा. पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, विविध स्पर्धा, मानवी साखळी, पालकांकडून संकल्प पत्र भरून घेणे, लोकशाही दौड, उद्योगातील कामगारांना प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम, सेल्फी पॉइंट, सायकल रॅली, गृहभेटीद्वारे मतदारांना मार्गदर्शन आदी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!