
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊरकुंभारी परिसरात विद्युतपंप चोरांचा सुळसुळाट झाला असून यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच
आळा घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र वक्ते यांनी केली आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना दि.१३ जुलै रोजी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी निवेदन दिले आहे. येथील महेंद्र रामदास वक्ते यांची जेऊरकुंभारी शिवारात गट नंबर १७\३ मध्ये सहा एकर शेती असून सदर शेतीतील विहिरीवरील लक्ष्मी कंपनीची अश्वशक्ती पाणबुडी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. गेल्या महिन्यापासून जेऊरकुंभारी परिसरात विद्युत पंप व केबल चोरीचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी यशवंतराव विठ्ठलराव आव्हाड, सागर गुरसळ, अमित गंगाधर भोंगळे, सुदाम तात्याराम वक्ते, मधुकर कचरू दौंड, किरण एकनाथ वक्ते, काशिनाथ पगारे या शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरीस गेले आहेत. चोरीचे सत्र असेच सुरू राहीले तर शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही ? असा सवाल महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला आहे. सध्या शेतात खरीप सोयाबीन, कपाशी, मका पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने आपले शेत फुलवण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यात नैसर्गिक आपत्तीला देखील सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. काहींनी दागिने गहाण ठेऊन भांडवल उपलब्ध केले आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे. विहीरीत थोडेफार पाणी आहे ते शेतीला दिले जात आहे. त्यातच चोरटे विद्युत पंपावर डल्ला मारत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी परिस्थितीती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे जेउरकुंभारी परिसरात
विद्युत रोहित्रे, विद्युत पंप यांचे चोरीचे वाढते प्रमाण बघता पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालत व चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी महेंद्र रामदास वक्ते यांनी केली आहे.


