

लोकप्रतिनिधीही मूग गिळून ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कोपरगाव शहरापासून गोदावरी नदी काठी काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तांडेल विश्रामगृह बांधण्यात आले व त्याचे उद्घाटन होवून अडीच वर्षे झाली तरी देखील वापराविना पडुन राहिल्याने भिंती व परिसर अस्वच्छ झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तसेच लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून बसले आहे. दोन दिवसांत विश्रामगृहाची स्वच्छता व नियोजन करून विश्रामगृह सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला. विशेष दुरुस्ती अंतर्गत सन २०२० – २१ मध्ये विश्रामगृहाची विशेष दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीचे कामकाज पूर्ण होवुन १५ ऑगस्ट २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या जल्लोषात माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विश्रामगृहाचे उद्घाटन केले. अडीच वर्षे होवून ही अद्यापही विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू करु शकले नाही हे कोपरगांवकरांसाठी फार मोठी शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधी फक्त उद्घाटन आणि नारळ फोडण्यासाठीच आहे का ? अशी विचारणा देखील नागरिक करत आहेत.
विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी व्यक्तींसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने कोणाची नियुक्ती केली आहे की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. बांधकाम विभागाकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने विश्रामगृहाची निगा राखण्यासाठी कोणीही तयारी दाखवत नाही.
लोकप्रतिनिधींचे खासगी गेस्ट हाऊस, कारखाना कार्यस्थळावर असलेले गेस्ट हाऊसवर अधिकारी, मंत्री, नेते मंडळी यांना बोलवुन पाहुणचार केला जात असल्याने शासकीय विश्रामगृहाकडे आता कोणी ढुंकूनही पाहात नसल्याने त्याची अवस्था भूतबंगल्यासारखी झाली आहे. लोकप्रतिनिधी देखील उद्घाटन करुन जवाबदारीतुन मुक्त झाले असले तरी त्यांना बंगल्याचे भुत बंगला बनविणाऱ्याना जाब विचारावा लागणार. दुर्लक्ष करायचे आणि निधीची कमतरता दाखवत खासगीकरण करायचे असा पवित्रा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे की काय ? असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित झाला आहे.


