
कोपरगाव प्रतिनिधी
राज्याची जीवन वाहिनी ठरलेल्या समृध्दी महामार्गाच्या अंडर पास मध्ये पावसाळ्यात पाणी साचते. शेतक-यांच्या दळणवळण करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या महामार्गाच्या उभारणीसाठी जेथे उत्खनन करण्यात आले. आता त्याच्या शेजारच्या जमिनी खचु लागल्या आहेत. तसेच ज्या शेतक-यांनी आपल्या जमिनी या महामार्गासाठी दिल्या नाहीत त्यांच्या जमिनीत देखील उत्खनन करण्यात आले. हे दोन्ही प्रकार गंभीर असून याची चौकशी करावी. शेतक-यांना दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलतांना केली.
ते म्हणाले, हा महामार्ग राज्याची जीवनवाहिनी ठरत आहे. कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गाचे अंतर२९.३९६ किलोमीटर आहे.या अंतरात स्थानिक नागरिकांच्या दळणवळणासाठी लहान-मोठे पूल आणि एकूण २४ अंडरपास बांधण्यात आले आहेत. कोपरगाव तालुक्यात जमिनीत खोलपर्यंत मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामार्गाच्या भरावासाठी ठेकेदाराला जवळच्या अंतरावर आवश्यक ते मटेरियल उपलब्ध झाले नाही. त्यामुळे संबधित ठेकेदाराने समृद्धी महामार्गाच्या मुख्य भरावाची उंची कमी करून त्याऐवजी महामार्गाखालून जाणाऱ्या सर्व बोगद्यांची खोली दोन ते अडीच फुटांनी वाढवली. हे काम नियमबाह्य आणि चुकीचे आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते व दळणवळणासाठी नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होतात. जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास पाणी जास्त दिवस साचून राहते त्यामुळे हे बोगदे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतात. गेल्या चार पाच वर्षांपासून अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.समृद्धी महामार्गाची निर्मिती करतांना या महामार्गाच्या भरावासाठी ज्या जमिनींचे उत्खनन झाले त्या जमिनीच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी खचू लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी जमिनींची मोजणी केल्यानंतर असे आढळून आले की, ज्या शेतक-यांनी आपल्या जमिनी उत्खननासाठी दिल्या नसतांना त्यांच्याही जमिनीत खोदाई करण्यात आली. हि अतिशय गंभीर बाब असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकाराची चौकशी करावी.- आमदार आशुतोष काळे.


