
कोपरगाव प्रतिनिधी
मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेल्या धोकादायक खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मा. व्यवस्थापकीय संचालक, समृद्धी महामार्ग प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ. विवेक कोल्हे यांनी मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित करताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा, द्रुतगती व उच्च दर्जाचा महामार्ग असून तो कोपरगाव मतदारसंघातून जातो. या महामार्गावरून दररोज हजारो प्रवासी तसेच मालवाहतूक करणारी वाहने अतिवेगाने प्रवास करतात. मात्र, शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था गंभीर व धोकादायक बनली आहे.सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अचानक खड्डा समोर आल्याने वाहनचालकांना तातडीने ब्रेक लावावे लागतात. परिणामी मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन साखळी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाहतूक यामुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून कोणतीही मोठी जीवितहानी अथवा दुर्दैवी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.समृद्धी महामार्गाचा टोल भरूनही वाहनचालकांना अशा स्वरूपाचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरातील सर्व खड्ड्यांची युद्धपातळीवर त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, रिफ्लेक्टर, वेगमर्यादा सूचना आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.ही बाब केवळ रस्त्याच्या दुरुस्तीपुरती मर्यादित नसून हजारो नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर आहे. वाहनांचे नुकसान,वाहतुकीतील अडथळे आणि अपघाताचा वाढता धोका लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेस तात्काळ आदेश देऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. सदर बाब गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


