
कोपरगाव प्रतिनिधी
“सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज क्षेत्रात समताने उल्लेखनीय पराक्रम केला असून, ही बाब आमच्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोनेतारण कर्जामुळे समताचा कारभार प्रगती पथावर असून संदीप कोयटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासदांना त्वरित सेवा देण्यासाठी सातत्याने नवे उपक्रम राबवत आहेत. त्यांना सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे. समता ही केवळ संस्था नसून एक मोठा परिवार आहे आणि अधिकारी, कर्मचारी हेच समताची खरी ताकद आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी बँका व पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी चेअरमन मिलिंद काळे यांनी केले.
नाशिक येथील आरिया रिसॉर्ट अँड पार्क येथे समता पतसंस्थेची ‘नवपर्व’ वार्षिक आढावा बैठक (२०२५-२६) संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद काळे उपस्थित होते. प्रेरणादायी वक्ते मनीष गुप्ता यांनी आपल्या व्याख्यानातून नव्या पर्वात संस्थेला अधिक उंचीवर नेण्यासाठी आवश्यक ध्येय, नियोजन आणि सकारात्मक ऊर्जेचा मंत्र दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितेंद्र शहा, कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, संचालिका अक्षरा पटेल, श्वेता अजमेरे, भरत अजमेरे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.
स्वागतपर मनोगत व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संदीप कोयटे यांनी केले, तर संस्थेचा मागील वर्षाचा वार्षिक आढावा जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सादर केला. यावेळी मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा प्रमुख पाहुणे मिलिंद काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ठेव वाढीत कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर व शिर्डी शाखांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सोनेतारण कर्ज वितरणात येवला, पुणे, वैजापूर, श्रीरामपूर, जामखेड तसेच पंचवटी, पुंडलिकनगर, नेवासा, निफाड आणि नांदगाव शाखांचा गौरव करण्यात आला. ठेव व कर्ज या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट योगदानाबद्दल येवला, पुणे, शिर्डी व संगमनेर शाखांना सन्मानित करण्यात आले. कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे, कोल्हार शाखेचे शाखाधिकारी व्यंकटेश वैष्णव तसेच शिर्डी शाखेचे शशिकांत सोनवणे आणि पुणे शाखेचे निरंजन शिर्के यांनाही विशेष गौरविण्यात आले. संस्थेचे जेष्ठ संचालक जितु भाई शहा यांनी प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, हितचिंतक यांचे आभार मानले
“आतापर्यंतचा प्रवास हा एका पर्वाचा होता; आता आपण नवपर्वात प्रवेश करत आहोत. चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून सुरू झालेली समता आज मोबाईल बँकिंग, पेपरलेस, व्हाउचरलेस आणि सेल्फ बँकिंगसारख्या अत्याधुनिक सुविधा सभासदांना देत उंच शिखरावर पोहोचली आहे. संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा व एकजूट हीच समतेची खरी ताकद आहे. समता आज बावनकशी सोन्यासारखी झाली असून, नव्या पर्वात या सोन्याला आणखी झळाळी देण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करूया.”- काका कोयटे


